इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता केवळ जमिनीवर किंवा हवेत मर्यादित राहिलेले नाही, तर ते 'डिजिटल युद्धा'च्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. इराणने आता जगाला 'ऑफलाईन' करण्याची धमकी दिली आहे. इराणच्या सागरी हद्दीतून जाणाऱ्या आणि जगाला इंटरनेटने जोडणाऱ्या समुद्राखालील केबल्स कापण्याचे संकेत इराणने दिले आहेत. यामुळे भारत, युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्ये 'इंटरनेट ब्लॅकआउट'चा धोका निर्माण झाला आहे.
'अंडरसी केबल्स' का आहेत महत्त्वाच्या?
जगाचा ९५% हून अधिक इंटरनेट डेटा हा उपग्रहाद्वारे नाही, तर समुद्राच्या तळाशी टाकलेल्या फायबर ऑप्टिक केबल्सद्वारे ट्रान्सफर होतो. लाल समुद्र आणि होर्मुझची सामुद्रधुनी हे भाग या केबल्सचे मुख्य केंद्र आहेत. इराणने या केबल्सना लक्ष्य केल्यास आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि एटीएम सेवा बंद पडतील. रिअल-टाइम डेटा अभावी जागतिक शेअर बाजार क्रॅश होऊ शकतात. व्हॉट्सॲप, गुगल, फेसबुक यांसारख्या सेवा पूर्णपणे बंद होऊ शकतात.
इराणची 'बार्गेनिंग' रणनीती
इराणने आधीच होर्मुझचा मार्ग बंद करून कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला आहे. आता इंटरनेट केबल्सला लक्ष्य करण्याची धमकी देऊन इराण पाश्चात्य देशांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. "जर आमच्यावर लष्करी हल्ले थांबले नाहीत, तर आम्ही जगाला अंधारात ढकलून देऊ," असा इशारा इराणच्या काही लष्करी गटांनी दिला आहे.
भारतावर काय होणार परिणाम?
भारताचा बहुतांश इंटरनेट ट्रॅफिक हा मुंबई आणि चेन्नई मार्गे याच अंडरसी केबल्सशी जोडलेला आहे. जर इराणने या केबल्सना नुकसान पोहोचवले, तर भारतातील 'वर्क फ्रॉम होम' (WFH), आयटी सेक्टर आणि डिजिटल पेमेंट सिस्टमला मोठा फटका बसू शकतो.